प्राचार्य रामदास थिटे : शिक्षकदिनी अध्यापक, पालकांना मोलाचा सल्ला
सणसवाडी – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उचलून धरताना इमारती, खोल्या, वर्ग यांत शिक्षण कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नव्या डिजीटल माध्यमांचा व आंतरराष्ट्रीय संकल्पनांचा विचार करून विद्यार्थी जगताच्या इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंतश्रेष्ठ आहे, असे मत जातेगाव येथील श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास थिटे यांनी शिक्षक दिनानिमित्त दैनिक प्रभातशी संवाद साधताना व्यक्त केले.
सन1992पासून जागतिकीकरण आणि उदारीकरणाला सुरुवात झाली. शिक्षणातील राष्ट्रीय उद्दीष्टे, धोरणे ज्या मूल्यांसाठी समोर, शिक्षणांमुळे विद्यार्थी आणि समाज घडला पाहिजे ही भूमिका स्पष्ट झाली. त्याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. व्यवसायाभिमुख, कौशल्य सेतू अभ्यासक्रम असतानाही केवळ नोकरीसाठी शिक्षण या भूमिकेला चिकटून मंडळी वेगळ्या दिशेने प्रवास करत आहेत. केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा मोहिम, शिक्षण हक्क कायदा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान, संच मान्यता, पवित्र पोर्टल प्रणाली, शालार्थ, शालेय पोषण आहार या आणि अशा अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु झाली. योजनांमुळे आपण पुढे जात असलो तरी विद्यार्थ्यांची मुलभूत कौशल्ये मात्र वाढतांना दिसत नाहीत. कोणताच वर्ग लेखन, वाचन, श्रवण, संभाषण कौशल्यांत 100 टक्के साक्षर दिसत नाही, हे शिक्षण व्यवस्थेतील मोठे आव्हान उत्तरदायित्व म्हणून आम्हांस स्विकारावे लागेल.
शिक्षणाने नागरिकत्वाचे संवर्धन व्हावे, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच विद्यार्थी स्वावलंबी बनावा ही शिक्षण भूमिकेची खरी गरज आहे. शिक्षणाने व्यक्तीच्या जीवनांत सुसंवाद, सामर्थ्य, सर्जनशीलता, नव विचारप्रवाहांचे दालन खुले व्हावे आणि उपयोजनात्मक विचारधारा अंगभूत व्हावी यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मांडला गेला आहे. आजही वास्तव असे आहे, पहिलीत 50 मुले दाखल झाली तर केवळ 19 टक्केच विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. प्रगत देशात हे प्रमाण 50 टक्के आहे. आपणांस स्थगन आणि गळती या प्रकारांना बाजूला सारत हे प्रमाण 2020 पर्यंत हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत न्यावे लागेल. प्रादेशिक असमतोल, प्रति विद्यार्थी खर्चाचे अत्यल्प प्रमाण, असमाधानकारक अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, व्यवस्थापनातील दबाव, गैरव्यवहार या बाबींमुळेही शिक्षणाला जागतिक उंचीवर नेण्यास आपण असमर्थ
ठरत आहोत.
शिक्षणतत्वाचे आचरण काय सांगते ?
विद्यालयांत प्रविष्ट होताना त्यास घटना, दर्जा, इतिहास आणि शिक्षण तपस्वी अध्यापक यांची ओढ असायला हवी. कार्पोरेट इमारती, क्लासेसच्या जाहिराती यांची भुरळ न पडता शिक्षण तत्व, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य आणि नागरिकत्त्वाचे संवर्धन याबाबत पालक -विद्यार्थी चौकस असणे गरजेचे आहे. लाखो रुपये देऊन प्रवेश मिळविणे यापेक्षा प्राध्यापक, अध्यापक यांच्या ओढीनं प्रवेश घेणं हे शिक्षण तत्वाचे खरे आचरण होय.
अध्यापक, प्राध्यापक यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी अद्वितीय आहे. गुणवत्तेसाठी चांगले, कृती युक्त, तंत्र स्नेही, मनोरंजक अध्यापन करूया. पालकांकडून आपले सदैव मूल्यमापन होत असते. त्यांच्या इच्छा, आकांक्षांना प्रगतीचे बळ देऊया. पालकांनी प्रेरणा, प्रोत्साहन आणि सुसंवादाने शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे. 10वी / 12 निकाल 100 टक्के लागला उत्तम. यापेक्षाही किती विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, किती नीट, आयआयटी परीक्षेत झळकले, किती प्रशासनात गेले, कोण उद्योग व्यवसायांत स्थिर झाले यासाठी समाज दक्ष असतो. शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक या घटकांमध्ये एक विश्वासाचे व संघकार्याचे नाते हवे. कायदा सुलभ व्यवस्थापनाच्या भूमिकेतून शिक्षणाची चळवळ उभारूया.
शासन, प्रशासनाकडून अपेक्षा
वेळच्या वेळी विद्यालय अनुदान, शिक्षक अनुदान, शासन निर्णय, धोरणे याबाबत केंद्र आणि राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावेत. तुकड्या-तुकड्यांनी घेतलेले निर्णय सर्वंकष शिक्षण विकासाची जागा घेउ शकत नाहीत. एकूणच देशातले उद्योगपती, राजकीय नेते, संशोधक, विचारवंत, खेळाडू, कलाकार यांच्या जडणघडणी मागे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा हातभार होता याचा विसर पडता कामा नये. डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन, डॉ. अब्दुल कलाम या तीन राष्ट्रपतींनी उच्च पदावर राहूनही शिक्षक या घटकांस महत्व दिले. आपणही तोच आदर कायम ठेवूया कारण यातच राष्ट्रहित जपलं आहे.