पणजी – विधानसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर गोव्यातील राजकीय लगबग वाढली आहे. त्या राज्यातील कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना एका रिसॉर्टमध्ये हलवले जाणार आहे. तर, गोव्यातील भाजप नेते पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. त्या राज्यात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवले आहेत. तसे झाल्यास सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू होईल. त्यातून इतर पक्षांचे आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ती शक्यता विचारात घेऊन सर्वच पक्ष खबरदारी घेत आहेत.
कॉंग्रेसने आपल्या नवनिर्वाचित आमदारांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. त्यातून पक्षाच्या सर्व उमेदवारांना उद्या एका रिसॉर्टमध्ये हलवले जाणार आहे. तिथून ते निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्रांवर दाखल होतील. निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांना कॉंग्रेसच्या मुख्यालयात जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गोव्याची सत्ता राखण्याचा विश्वास वाटणाऱ्या भाजपच्या गोटातील हालचालीही वाढल्या आहेत. त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गोव्यातील भाजपचे काही नेते मुंबईत फडणवीस यांची भेट घेणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हेही गोव्यात दाखल होणार असल्याचे समजते.
तृणमूल कॉंग्रेसने यावेळी प्रथमच गोव्याची निवडणूक लढवली. त्या पक्षाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली. आमची युती 10 ते 12 जागा जिंकेल. आमच्याशिवाय कुठलाच पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे पाठिंब्याच्या बदल्यात आम्ही मुख्यमंत्रिपद मागू, अशी भूमिका तृणमूलने मांडली आहे. आता गोव्यात नक्की काय घडणार ते निकालातून समोर येईल.