डॅमेज कंट्रोलचे आव्हान : संघटनवाढीचे शिवधनुष्य कोण उचलणार
वास्तविक एकेकाळी कॉंग्रेसचा देशात अन सातारा जिल्ह्यात दबदबा होता. मात्र, सन 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसला घरघर लागण्यास सुरूवात झाली. माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्या रूपाने थोडी फार कॉंग्रेस जिल्ह्यात शिल्लक राहिली. त्यानंतर माजी आमदार मदन भोसले एकदा निवडून आले. त्यापाठोपाठ आ.गोरे निवडून आले. मात्र, त्यानंतर भोसले यांना पुढे यश मिळू शकले नाही. 2014 च्या निवडणूकीनंतर जिल्ह्यात आ.चव्हाण व आ.गोरे हे दोन पक्षाचे आमदार जिल्ह्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यात कॉंग्रेसचे संघटन पुर्णत: ढासळले आहे. आता जिल्हाध्यक्षा ऐवजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष नेमण्याचे सूतोवाच आ.चव्हाण यांनी केले आहेत. त्यामुळे आपसुकच कॉंग्रेसची धुरा पुन्हा एकदा आ.आनंदराव पाटील यांच्याकडे जाणार आहे. मात्र, कराड तालुक्यातील युवा पदाधिकाऱ्यांना आ.पाटील यांचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे पेच अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आ.चव्हाण काय भूमिका घेणार, डॅमेज कसे रोखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सातारा – एकेकाळी सातारा जिल्ह्यात बालेकिल्ला राहिलेल्या कॉंग्रेसचे अस्तित्व आता कराडपुरते मर्यादित राहिले आहे. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यासह माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आ.जयकुमार गोरे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत तटस्थ भूमिका घेतल्यामुळे आता कॉंग्रेसचे डॅमेज रोखण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री व कराड-दक्षिण मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर असणार आहे.
आ.आनंदराव पाटील यांनी दिड दशके जिल्हाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलली. मात्र, आ.गोरे व आ.पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचल्यानंतर आ.चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यावर सोपविली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनंतरच निंबाळकर यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला अन माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पटकावली. तर आ.गोरे यांनी कार्यकर्त्यांमार्फत निंबाळकर यांच्या पाठीशी उभा राहण्याचे जाहीर केले.
दुसऱ्या बाजूला माजी आमदार मदन भोसले यांचा भाजपप्रवेश झाला. साहजिकच एकाच वेळी तीन खंदे नेते कॉंग्रेसपासून दूर गेले. असे चित्र असले तरी आ.गोरे हे अद्याप आ.चव्हाण यांच्यात संपर्कात आहेत. त्याचबरोबर त्यांनी धुळे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार देखील केला. एकूणच आ.गोरे यांनी कॉंग्रेस अन निंबाळकर यांच्या रूपाने भाजपला समान अंतरावर ठेवले आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ते भूमिका स्पष्ट करतील.