नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची बिकट अवस्था झाल्याचे चित्र देशभरामध्ये पाहायला मिळाले आहे. या अपमानजनक पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून तातडीने पक्षाच्या कार्यकारणी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची चांगलीच कानउघाडणी करताना काँग्रेसच्या या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला होता. मात्र कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष्य राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा एकमुखाने विरोध करत त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले होते.
अशातच आता काँग्रेस नेते एमएस रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा नाकारण्याच्या कार्यकारणीच्या निर्णयाचे स्वागत करताना पक्षाच्या देशातील सर्व प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही मागणी केली असून ते म्हणतात, “कार्यकरणीने राहुल गांधींचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा नाकारला. कार्यकारणीच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. कार्यकारणी समितीने पक्षाच्या पराभवानंतर देशभरातील काँग्रेस पक्षाची सर्वपातळीवर पुनर्बांधणी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. माझ्या मते कार्यकारणी समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारणीच्या तसेच अखिल भारतीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि खास करून सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा.”
MS Reddy,Cong: Congress Pres resignation was rejected by CWC. I welcome it.CWC resolution also said thorough re-structuring of the party at all levels. I think in order to set this in motion,I'll call upon all CWC members & AICC office bearers specially state in-charges to resign pic.twitter.com/sRWhzGOzKT
— ANI (@ANI) May 27, 2019