लखनौ- अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडली जाण्याच्या प्रकरणात केंद्रातील तत्कालिन कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्याला सूडबुद्धीने अडकवल्याचा आरोप भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केला. बाबरी पतन प्रकरणी त्या आज विशेष न्यायालयामध्ये हजर झाल्या.
तत्कालिन केंद्र सरकारने आपल्याविरोधात आणि अन्य आरोपींच्याविरोधात केवळ राजकीय स्वार्थासाठीच “एफआयआर’ दाखल केली आहे. बनावट पुराव्यांच्या आधारे केवळ राजकीय दबावाखाली आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोपही उमा भारती यांनी केला. या प्रकरणातील साक्षीदारांनी राजकीय वैमनस्यातूनच आपल्याविरोधात जबाब दिला आहे, असे सांगून सीबीआयने दाखल केलेले पुरावेही त्यांनी फेटाळून लावले.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांच्यासमोर उमा भारती यांनी त्यांचा जबाब नोंदवला. आपल्या बचावाचे पुरावे न्यायालयात सादर करण्याची तयारीही भारती यांनी दर्शवली. आपण स्वतः राम भक्त असून राममंदिराच्या आंदोलनात रामावरील श्रद्धेपोटीच भाग घेतला होता. या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल आपल्याला अभिमानच वाटतो आहे. आंदोलनात भाग घेतला तेंव्हा दुसऱ्यांदा खासदार बनले होते. गंगा, तिरंगा, गौ (गाय), गरीब, नारी आणि रामासाठी आपले आयुष्य खर्च करण्यास आपण तयार असल्याचेही उमा भारती यांनी सांगितले.
बाबरी पतन प्रकरणी एकूण 32 आरोपी आहेत. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासह अन्य 13 आरोपींचे निवेदन नोंदवणे अद्याप बाकी आहे.