मुंबई – बेळगाव हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शेजारी राज्याला इशाराही दिला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती शांत होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
येत्या 24 तासांत ही स्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यास जबाबदार असतील. बेळगावमधील लोकांना धीर देण्यासाठी माझ्यसह सगळ्यांना तेथे यावे लागेल. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. तसे होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका घेतली जात असेल तर तो देशाच्या स्थैर्याला धोका आहे व केंद्र सरकार यात बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही.
राज्यातील खासदारांनी उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदीय अधिवेशनात याबाबतची भूमिका मांडावी असे आपण त्यांना सांगणार असून कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्याची जबाबदारी कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारलाही घ्यावी लागेल असे पवार यांनी म्हटले आहे. झाला प्रकार (दगडफेकीचा) अत्यंत निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सुरू आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची चौकशी केली जात असल्याची माहिती आपल्याला समजली आहे. हा गंभीर प्रकार आहे असेही ते म्हणाले.
“महाराष्ट्रातील वाहनांवरच्या या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्राच्या स्वाभीमानावरच हा हल्ला असून सीमा भागातील मराठी भाषिकांवर दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही. महाराष्ट्र सरकारने बोटचेपी भूमिका सोडावी आणि आरे ला कारे म्हणण्याचे धाडस दाखवावे. असले भ्याड हल्ले सरकारने खपवून घेऊ नये.”
– अजित पवार, विरोधी पक्ष नेते
फडणवीसांचा बोम्मईंना फोन
टोलनाक्यावर महारष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. बोम्मई यांनी यात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी असेही फडणवीस यांनी त्यांना म्हटले आहे. तर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचा शब्द बोम्मई यांनी दिला असल्याची माहिती सांगण्यात आली.