कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे सूतोवाच
पुणे – जैविक, व्यावहारिक व तंत्रज्ञानात्मक पातळीवर एकत्र येऊ शकणाऱ्या विभागांची एक संकुल तयार झाले तर, प्रशासन आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजाणी करणे सोयीस्कर होईल. परंतु, आंतरविद्याशाखीय किंवा अध्ययन-अध्यापन व संशोधनाची संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने विद्यापीठात स्कूल प्रणाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरूंनी अहवाल सादर केला. त्यात त्यांनी विद्यापीठ व महाविद्यालयात संशोधनाची संस्कृती निर्माण होण्यासाठी विद्यापीठात स्कूल प्रणाली सुरू करण्याचे सुतोवाच केले आहे. विद्यापीठाचा परिसर साने गुरुजींच्या “आंतरभारती’ सारखा एकमेकांशी जोडला जाणे महत्त्वाचे आहे. भारताची विविधता अबाधित राखून एकमेकांमध्ये आदानप्रदानाला चालना देणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच, विद्यापीठ परिसरातील वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न आहे. किमान जैविकपणे एकमेकांशी संबंधित असलेले व सवता सुभा केलेले विभाग तरी एकत्र आले पाहिजे. त्यादृष्टीने संकुल (स्कूल) संकल्पना अंमलात आणण्याचा अतिशय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करीत असल्याचे कुलगुरूंनी अहवालात स्पष्ट केले.
शैक्षणिक विभागाची पुनर्रचना महत्त्वाची आज मानवी जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचे झाले आहे. ज्ञानाच्या कक्षाही मोठ्या प्रमाणावर रुंदावत आहेत. विज्ञानातील नवनवी संशोधने, संपर्क व संवाद माध्यमातील क्रांतीमुळे दैनंदिन जीवनाही आमूलाग्र बदलले आहे. परिणामी शिक्षणासमोरचे आव्हानही मोठे अ ाहे. नवा, अधिक मानवी व न्याय समाज घडवण्याचे आव्हान आजच्या शिक्षणासमोर आहे. म्हणून या सर्व अंगाचा विचार नव्याने करण्याची आणि त्यानुसार शैक्षणिक विभागाची पुनर्रचना करण्याची ही वेळ विशेष महत्त्वाची आहे, असेही कुलगुरू डॉ. करमळकर यांनी म्हटले.
अभ्यासक्रमात बदल आवश्यक
विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय या चार विद्याशाखांमधील विद्यार्थी शिक्षणानंतर संशोनासाठी प्रवृत्त झाले पाहिजेत. त्यासाठी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याची नितांत गरज आहे. किमान विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभागांना एकत्र आणून यावर ठोस अंमलबजावणी उपक्रम व तत्काळ धोरण निश्चित करण्याची वेळ आली आहे. जीवनातून जीवनासाठीचे शिक्षण देण्याच्या पद्धतीस महात्मा गांधीजींनी “नयी तालीम’ असे प्रारूप दिले आहे. या प्रारुपाची आवश्यकता स्कूल प्रणालीत आहे, याकडे कुलगुरूंनी लक्ष वेधले. महत्त्वाचे म्हणजे लिबरल आर्ट हे गांधीजींच्या “नयी तालीम’ याचे प्रगत प्रारूप असल्याचे ते म्हणाले.