आकुर्डी :प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांना त्यांनी स्वरबद्ध केलेल्या सिनेगीतांवर आधारित “करोगे याद तो हर बात याद आयेगी’ या सांगितिक कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करताना साहित्यिक.
पिंपरी (प्रतिनिधी) -प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांना त्यांनी स्वरबद्ध केलेल्या सिनेगीतांवर आधारित “करोगे याद तो हर बात याद आयेगी’ या सांगीतिक कार्यक्रमातून साहित्यिकांनी आदरांजली समर्पित केली. आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूल येथे शब्दधन काव्यमंच आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे होते. याप्रसंगी बीना एज्युकेशन ट्रस्टचे आझमखान, प्रा. तुकाराम पाटील, रमेश वाकनीस, निशिकांत गुमास्ते, तानाजी एकोंडे, आत्माराम हारे, सुप्रिया सोळांकुरे, बी. एस. बनसोडे उपस्थित होते. हिरवे म्हणाले, “”खय्यामजी यांची भेट माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. शब्दांना संगीतसाज देताना त्यांनी सुमारे 71 चित्रपटांमधून सहाशेहून अधिक गीतांना अप्रतिम चाली दिल्या.” मैफिलीची सुरुवात कवी आणि गायक देवेंद्र गावंडे यांनी “करोगे याद तो हर बात याद आयेगी’ या गीताने केली. गावंडे यांनी “”फिर छिडी रात, बात फुलोंकी…’ हे गीत सादर केले. गायक दीपक शर्मा यांनी “मोहब्बत बडे कामकी चीज है’, “जीतही लेंगे बाजी हम तुम’आणि “हजार राहे मुडके देखी…’ ही गीते सादर केली.
कवी रघुनाथ पाटील यांनी “आँखों मे हमने आपके सपने सजाये है..’, सविता इंगळे आणि दीपक शर्मा यांनी “जानेमन तुम कमाल करती हो..’ की गीते सादर केली. डॉ. शुभा लोंढे यांनी “ये दिल-ए नादान’ आणि “बहारों मेरा जीवन भी सवारों…’, नंदकुमार कांबळे यांनी “मै पल दो पलका शायर हूं..’ आणि सुभाष चव्हाण यांनी “कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है’ ही खय्याम यांची गीते सादर केली. राज अहेरराव, बशारत अली खान, आय. के. शेख, उज्ज्वला केळकर, शोभा जोशी यांनी गीते सादर केली. “दिल चीज क्या है…’ या गीताने मैफलीचा समारोप झाला.
सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. अंतरा देशपांडे, फुलवती जगताप, अजित जगदाळे, वर्षा जगदाळे, गणपती पांचाळ, युवराज गायधनी, अभिजित काळे यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश भोसले यांनी आभार मानले.