कुरकुंभ- कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहती मधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनी मधील बुधवार (दि.१४) रोजी झालेल्या भीषण आगीच्या घटना स्थळाची पाहणी करून,या घटनेची पूर्ण तपासणी व चौकशी होई पर्यंत कंपनी बंद राहणार व कंपनीवर गुन्हे दाखल करणार असे राज्याचे पर्यावरण व कामगार राज्य मंत्री बाळा भेगडे यांनी शनिवार (दि.१७) रोजी एमआयडीसी कार्यालया मध्ये स्थानिक ग्रामस्थांशी भेट घेऊन सवांद साधला, यावेळी ते बोलत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतील कंपन्यापासून वायुप्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही कंपन्या त्यांचे दूषित रसायनमिश्रित पाणी उघड्यावर सोडत असल्याने येथील शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संबधीत प्रशासकीय अधिकारी कंपनी व्यवस्थापनेला पाठीशी घालत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
पर्यावरण व कामगार राज्य मंत्री बाळा भेगडे पुढे बोलताना म्हणाले की, कंपनी पेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. भीषण आगीची सखोल चौकशी करून कंपनी व शासकीय अधिकारी दोषी आढळल्यास संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असून चौकशी पूर्ण होई पर्यंत कंपनी बंद ठेवण्यात येईल तसेच पुढील दोन ते तीन दिवसात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सोबत बैठक घेऊन नागरिकांना न्याय देण्यात येईल.गरज पडल्यास मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल.
रासायनिक पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेत जमिनी मालकांना भरपाई देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात येतील.तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील सर्व कंपन्यांची साठवणूक,उत्पादित मालाची व अपघात प्रवण क्षेत्राची माहिती असलेली माहीती पुस्तिका एक महिन्याच्या आत परिसरातील ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे.कुरकुंभ औद्योगिक कार्यालयात प्रदूषण मंडळाचे अधिकारी आठवड्यातील एक दिवस नागरिकांसाठी उपलब्ध राहतील असे सांगितले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे,तानाजी दिवेकर,राहुल शितोळे,सनी सोनार,मनोज फडतरे,आयुब शेख, विनोद शितोळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.