– गायत्री वाजपेयी
पुणे – लॉकडाऊननंतर परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी “कमी यंत्रणेत, अधिक काम’ हे धोरण अवलंबले आहे. मात्र, याचा तेथील कर्मचाऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. सद्यस्थितीत कामाचा ताण प्रचंड वाढल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी “प्रभात’कडे व्यक्त केली.
लॉकडाऊनच्या काळात नोकरदारांच्या “वर्कस्पेस’ आणि “वर्ककल्चर’मध्ये काही नवीन बदल घडले. अनलॉकनंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कर्मचारी तारेवरची कसरत करत आहेत. त्याचवेळी, एकीकडे 2019च्या उत्तरार्धापासून सुरू असलेली जागतिक मंदी आणि गेल्या पाच महिन्यांपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांवर गंभीर परिणाम झाले.
आर्थिक मंदीमुळे कमी होणारे प्रकल्प, लॉकडाऊनमुळे वाहतूक आणि कामकाजावर आलेले निर्बंध यामुळे विविध क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीत कंपनी व्यवस्थापनापुढे व्यवसाय सुरू ठेवण्याचे आव्हानच उभे राहिले. त्यासाठी कंपन्यांनी बचतीच्या उपाययोजनांची धोरणे अवलंबण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. नाव न छापण्याच्या अटीवर व्यवस्थापन क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणाले, “”सध्या कंपन्यांसमोर विविध अडचणी आहेत. गेल्या सहा महिन्यांत बऱ्याच कंपन्यांचे काम पूर्णत: ठप्प होते. तर काहींनी “वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडत, बदलत्या परिस्थितीशी जूळवून घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र ही पद्धत स्वीकारण्यास काहीसा वेळ लागला. सध्याही नवीन प्रकल्प हाती येण्यास अजून काही काळ जावा लागेल. त्यामुळे अशा वेळी बहुतांश कंपन्यांनी “कमी यंत्रणेत, अधिक काम’ हे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे बचतीसाठी मनुष्यबळ कमी करण्यास सुरुवात केली. कर्मचारी कपात एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आहे त्याच कर्मचाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेण्याचा आटापिटा सुरू असल्याने अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.”
कामाच्या तुलनेत मिळणारा पगार कमीच…
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली. तर काही कंपन्यांनी तीन महिने पगार न देण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवले आहे. अशा स्थितीत नोकरी टिकवण्याच्या भीतीने कर्मचारी आहे त्या परिस्थितीत काम करत आहेत. एकीकडे पगार कमी, तर दुसरीकडे अतिरिक्त कामाचा ताण यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांची घुसमट होत आहे.
उच्च आणि कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना “नारळ’
कंपनीतील सर्वात वरिष्ठ पदावरील कर्मचारी तसेच सर्वात कमी पदावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे. वरिष्ठ पदावरील व्यक्तींना मिळणारा जास्त पगार आणि कमी पदावरील कर्मचारीकडून तुलनेने होणारे कमी काम अशी सांगड घालत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडे पैसे वाढवून त्यांच्याकडून जास्त काम करून घेण्याची पद्धत अनेक कंपन्यांनी अवलंबिली आहे. त्यामुळेच कमी मनुष्यबळात अधिक काम कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम:
सध्याच्या स्थितीत कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. कामाच्या वाढत्या ताणामुळे, बदललेल्या स्वरूपामुळे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. त्यातच अजूनही करोना संसर्गाची भीती असल्याने घराबाहेर जाऊन व्यायाम करणे, फिरणे यासारख्या गोष्टी तुलनेने कमी झाल्या आहे. तसेच घरून काम करताना अनेकदा कर्माचाऱ्यांना तासन्तास लॉपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करावा लागत असल्याने भविष्यात डोळ्यांवर परिणाम होणे, पाठदुखीचा त्रास अथवा अन्य शारीरिक त्रास होण्याची संभावना नाकारता येत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.