निकाल कसा लागणार यावरून विद्यार्थी चिंतेत
पुणे – विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून विद्यार्थी, पालक, महाविद्यालये संभ्रमात आहेत. निकाल कसा लागणार यावरून विद्यार्थी चिंतेत आहेत. यावरून अर्थसंकल्प अधिसभेत सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी परीक्षेचा संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठातर्फे समिती नेमली जाणार असल्याचे सांगितले.
करोनामुळे पुणे विद्यापीठाची अधिसभा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली. यात स्थगन प्रस्तावाद्वारे अन्य विषय बाजूला ठेवत परीक्षेच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी डॉ. शामकांत देशमुख यांनी केली. त्यावेळी त्यांनी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे ती कशी घेतली जाणार, गुण कसे दिले जाणार, पदवी देताना दुजाभाव केला जाणार नाही ना, बॅंकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय आहे यासह अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. यावर विद्यापीठाने खुलासा करावा आणि एक समिती नेमून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली.
दरम्यान, परीक्षा न देता पदवी घेतली तर काय होणार यासह अन्य प्रश्नांच्या चक्रव्युहात विद्यार्थी, पालक अडकले असून, ते तणावातून जात आहेत. यातून विद्यापीठाने त्यांना बाहेर काढले पाहिजे. तसेच, अधिसभेमध्ये परीक्षेवर ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका प्राचार्य संजय खरात आणि बागेश्री मंठाळकर यांनी मांडली.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, परीक्षेचा संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठातर्फे समिती नेमून, त्याद्वारे जलदगतीने काम करून निर्णय घेतले जाणार आहे. याबाबत राज्यातील अन्य विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक शुक्रवारी होणार आहे. त्यामध्येही परीक्षेच्या विषयावर चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
काही सदस्यांचा सभात्याग
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रथमच ऑनलाइन अधिसभेची बैठक झाली. त्यात अनेक सदस्यांचा ऑफलाइनचा आग्रह असतानाही विद्यापीठाने ऑनलाइनच बैठक घेतली. मात्र, ऑनलाइनद्वारे आपले म्हणणे मांडता आले नाही, असे काही अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे. ऑनलाइन बैठकीत योग्य नियोजन झाले नसल्याचे प्रश्न उपस्थित करीत काही सदस्यांनी सभात्याग केला.
गृहीत धरल्याने प्रशासनावर टीकेची झोड
अधिसभा सदस्यांनी प्रश्न विचारले, पत्र पाठवले तरीही विद्यापीठ प्रशासन उत्तर देत नाही. आम्हाला तुम्ही गृहित धरता का? असा प्रश्न करत प्रशासनाला अधिसभेत जाब विचारला. विद्यापीठाची अधिसभा ऑनलाइन न घेता ऑफलाइन घ्यावी, अशी अनेक सदस्यांची मागणी होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव ही ऑनलाइनच घेण्यात आली. अधिसभा सदस्यांनी याबाबत विद्यापीठाकडे त्यांचे म्हणणे मांडले होते. तरीही त्यास उत्तर दिले नाही. यापूर्वी अनेकदा अशाच प्रकारचा अनुभव आला आहे, अशी टीका अनेक सदस्यांनी केली.