पिंपरी – नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ठराविक वारी दुपारी तीन ते पाच वाजताच्या वेळ दिली आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः कार्यालयाबाहेर येऊन स्वागत कक्षात येत नागरिकांच्या तक्रारी ऐकताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका वृद्ध दांपत्याला मारहाण केल्याची घटना दैनिक प्रभातने उघडकीस आणली होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन नागरिकांसाठी राखीव ठेवले आहेत. दुपारी ते पाच वाजताच्या दरम्यान नागरिक पूर्व परवानगी शिवाय आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटू शकणार आहेत. मात्र सध्याचा करोनाचा काळ आणि नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेत पोलीस आयुक्त स्वतः कार्यालयाबाहेर येऊन स्वागत कक्षात उभे राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीचे स्वरूप पाहून आयुक्त संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोन करून कारवाईबाबत सूचना देत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. मात्र एखाद्या पोलीस ठाण्याबाबत तक्रार असल्या नागरिकांनी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याशीही संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाच्यावतीने केले आहे.