नवीन निकष ठरवावे लागणार असल्याचे अभ्यासकांचे मत
पुणे – पर्यावरणावर विदारक परिणाम करणाऱ्या प्रदूषणाबाबत काही निकष नव्याने तयार करण्याची गरज करोनामुळे निर्माण झाली आहे. कारण, प्रदूषणाचा “रंग’ बदलतो आहे. प्रदूषणाच्या पारंपरिक निकषांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्याचे नवीन निकषांवर आधारित विस्तृत कार्य आराखडा (ऍक्शन प्लॅन) तयार करण्याची गरज अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणावर आणि मानवी शरीरावर होणारे विपरित परिणाम आपल्याला माहित आहेत. हवा प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे विकार, जलप्रदूषणामुळे होणारे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार यासारख्या रोगांमुळे तसेच ध्वनी प्रदूषणामुळे उद्भवणारा कर्णबधिरपणा, ताण, भिती, नैराश्य, यासारखे आजार यामुळे दरवर्षी लाखो लोक बाधित होत असल्याचे विविध आरोग्य संस्थांच्या अहवालातून समोर आले आहे.
मात्र, या परिणामांची तीव्रता आणि प्रदूषणाची कारणे यांची सांगड घालत प्रदूषणाबाबत काही मानके ठरविण्यात आली आहेत. तसेच या प्रदूषणाची काही ठराविक कारणे देखील अधोरेखित करण्यात आली आहे. उदाहरण म्हणजे, पुणे शहरात हवा प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत म्हणजे हवेतील पर्टीक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन ऑक्साईड या हानिकारक घटकांमधील वाढ. याचे मुख्य कारण वाहन आणि औद्योगिक क्षेत्रातून कार्बन उत्सर्जन हे समजले जात होते. मात्र, लॉकडाऊन काळात या दोन्ही गोष्टी दोन महिने बंद होत्या, त्यामुळे हवेच्या प्रदूषणात घट झाली. मात्र, ते पूर्णत: कमी झालेले नाही. जलप्रदूषणाबाबतही हीच परिस्थिती दिसून येते. केवळ औद्योगिक सांडपाणी नव्हे, तर घरगुती सांडपाणी हा देखील जलप्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे समोर आले आहे. तर, ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी सक्षम यंत्रणाच आपल्याकडे उपलध नसून, काही ठराविक औचित्या वेळीच या नोंदी घेतल्याचे दिसून येते. एकूणच पर्यावरणाचे अस्तित्वात असलेले निकष पुन्हा एकदा पडताळून, नवीन निकष आणि त्यावर आधारित नवीन कृती आराखडा तयार करण्याची गरज सध्या दिसून येत आहे.
लॉकडाऊन काळात हवा प्रदूषणाबाबत केलेल्या अभ्यासामुळे प्रदूषणाबाबत कही नवे निकष ठरविण्याची गरज असल्याचे जाणवले आहे. या इतर प्रदूषकांबाबत सविस्तर अभ्यास करून पुढील काळात त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार करणार आहे.”
– डॉ. गुफ्रान बेग, संचालक, सफर- आयआयटीएम