सातारा – सातारा शहर परिसरात जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सातारा शहराचा पारा 11 सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे हिमकणांची चादर पसरली आहे. येत्या दोन दिवसात आणखी तापमान उतरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
सातारा आणि परिसरात शुक्रवारी 25.2 कमाल व 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून प्रचंड गारठा वाढला आहे. सकाळ, संध्याकाळच नव्हे तर दिवसभर थंडी जाणवत आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका वाढला असल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखीचा त्रास अनेकांना होत आहे. वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर, टोप्या, मफलर, कान टोप्या, उबदार जर्किन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसू लागला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा परतीचा मान्सून लांबल्याने महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव उतरार्धात जाणवू लागला आहे . थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सातारा शहररासह गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढत्या गारठ्यामुळे सायंकाळी रस्ते लवकर निर्मनुष्य होत आहेत.