पुणे – शहरात आठभरापासून मुक्कामाला असलेल्या थंडीचा कडाका बुधवारीदेखील (दि.10) कायम होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडूनही पुरेशी काळजी घेतली जात असून, पहाटेवेळी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविल्याचे, तर कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून स्वेटर, जॅकेट, स्कार्फ यांचा वापर केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या परिणामातून पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. बुधवारी पुण्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम होता.
पुण्यात बुधवारी 9.2 अंश सेल्सिअस किमान, तर 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमाची नोंद घेण्यात आली. राज्यात जळगाव येथे सर्वात कमी 9.0 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर, राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 9 ते 14 अंश सेल्सिअसदरम्यान होते.
राज्यात वाऱ्यांच्या प्रवाहासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने थंड हवेच्या परिणामामुळे वातावरणात बदल होत आहे आणि तापमानातही सातत्याने घटत आहे. दोन दिवस तापमान कायम राहणार असून, त्यानंतर थंडी कमी होईल अशी शक्यता विभागाने वर्तवली आहे.