शेखर गोरे ; कॉंग्रेसच्या आमदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये
सातारा – माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कठापूर योजनेतून पाणी देण्याचा प्रश्न भाजप-शिवसेना युती शासनामुळे निकाली निघाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द खरा केला आहे. या योजनेसाठी युती शासनाने 350 कोटींचा निधी जाहीर केला आहे.
याबद्दल युती शासनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या निर्णयामुळे माण तालुक्याच्या उत्तर भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या आमदारांनी करू नये, असे प्रतिपादन शिवसेनेचे माण-खटावचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी केले. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, युती शासनामुळे माणच्या उत्तर भागासाठी या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
त्यासाठी भाजप-शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला असतानाही नेहमीच दुसऱ्याचे श्रेय घेण्याची सवय असलेले माणचे कॉंग्रेसचे आमदार पुन्हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. आघाडी शासन असतानाही अन् नसतानाही त्यांचा या योजनेशी काहीही संबंध नाही. या योजनेला युती शासनाने जन्म दिला आणि ती पूर्णत्वासही युती शासनच नेत आहे.
जिहे-कठापूरचे पाणी उत्तर माणच्या 32 गावांना मिळावे यासाठी शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे माण तालुक्यातील भाजप-शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. मंत्री महोदयांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मांडून प्रशासकीय मंजुरी मिळवली.
या योजनेसाठी नितीन बानुगडे हे सहकाऱ्यांच्या साथीने गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहेत. या योजनेच्या वाढीव खर्चाला सध्याच्या युती सरकारनेच सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात खटाव तालुक्यातील नेर धरणात पाणी आणून येरळा नदी प्रवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात आंधळी धरणात पाणी आणून माणगंगा प्रवाही करून बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. पाणी प्रश्नासाठी पदाचा त्याग करावा लागला तरी चालेल, पण दुष्काळी भागांना पाणी मिळावे, असा निर्धार बानुगडे यांनी केला होता.
माढ्यातून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा शब्द त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही माण-खटावचा पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळला आहे. मात्र, कॉंग्रेसचे आमदार खोट्या श्रेयाची टिमकी वाजवत आहेत. आघाडी शासन असतानाही हे आमदार दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेत होते. आता तर त्यांचे शासनही नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आता तरी सोडून द्या, असा सल्ला शेखर गोरे यांनी दिला आहे.
कॉंग्रेसच्या आमदारांनी नेहमी “गाजर’ दाखवले
कॉंग्रेसच्या आमदारांनी माणच्या जनतेला नेहमीच “गाजर’ दाखवले. उरमोडीच्या पाण्याचे नाटक करून त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकली तरी उरमोडीच्या पाण्यासाठी त्यांच्याच नेत्यांना अजूनही उपोषणे करावी लागत आहेत. यावरून त्यांनी उरमोडीसाठी काय केले, ते सर्वांना कळलेय. आता ते जिहे-कठापूरच्या नावाखाली येती निवडणूक जिंकण्याचा त्यांचा विचार असला तरी त्यांच्या या भूलथापांना आता जनता फसणार नाही, असा विश्वास शेखर गोरे यांनी व्यक्त केला आहे.
पाण्याच्या मुद्यावरच युतीला पाठिंबा
माण-खटावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तुम्ही आमच्या भागाचा पाणी प्रश्न सोडवा, माढ्याचा खासदार भाजपचाच असेल, असा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला होता. निवडणुकीत मी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवत प्रामाणिकपणे काम केले. मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द खरा केला असून मी त्यांचे व युती शासनाचे आभार मानतो, असे शेखर गोरे यांनी म्हटले आहे.