नवी दिल्ली : चीनने कोणतीही आगळीक केल्यास लष्कराला चोख उत्तर देण्याची मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळेच चीनशी लागून असणाऱ्या सीमेवर पुरेसे जवान, लष्करी साधने आणि साहित्य तैनात करण्यात आले आहे, असे केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सीमेवर अद्याप ढग कायम असल्याचे चित्र कायम आहे.
करोनाचे संकट अद्याप कायम असतानाही सशस्त्र सेनेने मोक्याच्या ठिकाणी आपले जवान सज्ज केले आहेत. ते कोणत्याही घडामोडींना सामोरे जाऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.
चीनच्या हटवादी भूमिकेमुळेच चर्चेत कोणतीही प्रगती होत नाही. हा आमचाच भूभाग आहे, ही त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे चर्चेत मार्ग निघणे कठीण आहे. मात्र चर्चा सुरू ठेवण्यावर अद्याप दोन्ही बाजू सकारात्मक आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहेत.
बिजिंगमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक पातळ्या झाल्या आहेत. तर लष्करी पातळीवर कमांडर पातळीवर सहा जून आणि 22 जून रोजी चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. या सर्व चर्चेत सीमेवरील स्थिती तणाव निर्माण होण्यापुर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात होती तशी ठेवण्याची भारताची भूमिका कायम आहे.
भारताने दीर्घ कालीन संघर्षाची तयारी केली आहे. भौगोलिक सार्वभौमत्वाबाबत समझोता हा सरकारपुढील पर्याय नाही. त्यामुळे सीमेवर कोणत्याही घडामोडींना सामोरे जाण्याची सरकारची मानसिकता बनली आहे, असे या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी रशियावरून परतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लडाखमधील स्थितीचा आढावा घेतला. सिंह यांच्या निवासस्थानी दोहोंमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सीमेवरील प्रत्यक्ष स्थिती आणि लष्कराची तयारी यांची माहिती दिली. लष्करी अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या फेरीतील 22 जून रोजी चर्चा झाल्यानंतर या दोहोंत प्रथमच थेट चर्चा झाली.
सरकार चीनी आक्रमणाविषयी अनभिज्ञ असल्याचे चित्र निर्माण होत आहे, असे विचारता हा अधिकारी म्हणाला, ही वेळ सध्या एकमेकांवर अरोप प्रत्यारोप करण्याची नसून कोणत्याही स्थितीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची आहे.