मुंबई – भारत आणि ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट लढती म्हटले की, आजही सुनील गावसकर आणि डेनिस लिलीदरम्यान उडालेली चकमक क्रीडारसिकांच्या स्मरणात आहे. अनेकांनी भारताच्या ऑस्ट्रेलिया मालिकेच्या पार्श्वभूमीवर या सामन्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या असून चिडक्या ऑस्ट्रेलियन्सबाबत विद्यमान संघाला सावधगिरीच्या सूचनाही दिल्या आहेत.
वर्ष 1980 च्या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत सुनील गावसकरना चुकीचे बाद दिल्यानंतर त्यांनी सामना अर्ध्यावर सोडण्याची दाखवलेली तयारी आणि मग कपिल देवच्या करामतीने जिंकलेला सामना. भारताने ही मालिका बरोबरीत सोडवली असली, तरी अखेरच्या सामन्यातील विजयामुळे चिडक्या ऑस्ट्रेलियन्सचे पितळ उघडे पडले होते.
पहिल्या डावात भारताने गुंडाप्पा विश्वनाथच्या शतकाच्या जोरावर 237 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ऍलन बॉर्डरचे शतकाच्या (124), जोरावर 419 धावा केल्या. मग भारताचा दुसरा डाव सुरू झाला आणि 10 फेब्रुवारीला तो नाट्यमय क्षण आला. सलामीवीर चेतन चौहान आणि सुनील गावसकर यांची 165 धावांची भागीदारी झालेली असताना गावसकर 70 धावांवर खेळत होते.
डेनिस लिलीचा एक खाली राहिलेला चेंडू गावसकर यांच्या बटची कड घेऊन पॅडसवर आदळला. उत्साहात लिलीने अपील केले आणि पंचांनी तत्काळ गावसकर यांना पायचित बाद दिले. आपण हा चेंडू बॅटने खेळल्याचे सांगण्याचा गावसकर यांनी प्रयत्न केला; पण तो विफल ठरला. संयमित वागणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावसकर यांचा रागाचा पारा चढला आणि अखिलाडू पंच रेक्स व्हाईटहेड व ऑस्ट्रेलियन संघावर राग म्हणून गावसकर यांनी सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
पॅव्हेलियनकडे येताना त्यांनी सहकारी फलंदाज चेतन चौहान यालाही मैदान सोडण्यास सांगितले. मैदानावर प्रचंड तणाव पसरला आणि प्रेक्षकही स्तब्ध झाले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून संघ व्यवस्थापक विंग कमांडर शाहिद दुर्राणी धावत सीमारेषेजवळ गेले आणि त्यांनी गावसकर-चौहान ड्रेसिंग रुमकडे येण्यापूर्वी त्यांनी पुढचा फलंदाज वेंगसरकरसमवेत चौहानला खेळपट्टीवर अक्षरश: पिटाळले. अन्यथा गावसकर आणि चौहान यांच्यासह सर्व खेळाडूंवर पाच वर्षांची बंदी लागू झाली असती.
पुढे खेळताना भारताने गावसकरच्या 70, चौहानच्या 85 आणि वेंगसरकरच्या 45 धावांच्या बळावर 324 धावा केल्या. यात लिलीने 4 विकेट्स घेतल्या. संतापाने थबथबलेल्या आणि आपल्या सहकारी खेळाडूवर अन्याय झाल्याच्या भावनेने भारत मैदानात उतरला. जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अवघे 143 धावांचे आव्हान होते. पण एखाद्या वणव्यासारख्या पेटलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 83 धावांत उखडला. यात कपिल देवने 28 धावांत 5, घावरी आणि दोशीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.