मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवार (दि. 28) ते रविवार (दि. 31) पर्यंत कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेगाव तालुक्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, आपल्या गावाच्या वेशीवर करोना आजार येऊन ठेपला असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचा संबंध ग्राहकांशी थेट येत आहे. मंचर शहराच्या आजूबाजूच्या काही गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योजक अजय घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ खुडे आणि आशिष पुंगलिया यांनी दिली.
व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून दुकाने बंद ठेवावीत. बंदच्या काळात किराणासहित सर्व दुकाने बंद राहतील. दुधाची दुकाने सकाळी सहा ते नऊ वेळेत चालू राहतील. त्यांनी इतर कोणतेही पदार्थ विकू नयेत.
दवाखाने (पूर्णवेळ) आणि औषधांची दुकाने (ठराविक वेळेत चालू राहतील) बंदमध्ये चोरून-लपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून दंड आकारण्यात येईल, असा इशारा मंचर शहर व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.