नगर – दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने नगर शहरात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दुचाकीचालकांसह इतर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
नगर शहर संवेदनशील समजले जाते. त्यामुळे शहरातील भिंगार, आलमगीर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, मुकुंदनगर, झेंडीगेट, आशा टॉकीज चौक, पंचपीर चावडी आदी भागात चौका-चौकात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वाहनचालकांची तपासणी करून कागदपत्रे पडताळून पाहिली जात आहेत. कागदपत्रे नसल्यास कारवाई सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे.
पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या सूचनेनुसार शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणखी काही दिवस शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे तपासणी करण्यात येणार आहे.