राहुल गांधीची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करत असताना समर्थन करणाऱ्यांवरदेखील टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे. या विधेयकाचे समर्थन करणारे आपल्या देशाच्या जो पाया आहे त्याच्यावरच हल्ला करत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारी देशांतील अल्पसंख्याक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांतील वक्त्यांनी केला आहे.