हा मथळा वाचून “कसले वर्तुळ?’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण आजकाल येणाऱ्या रोजच्या वर्तमानपत्रातल ठळक पहिल्या पानावरील बातम्या वाचल्या की, मन उद्विग्न होते व वरील विचार मनात यायला लागतात.
स्त्रियांवरील अन्याय अत्याचार हे अनादि काळापासून आहेत. स्त्री ही भोग्य वस्तू आहे, ही पुरुष जातीची धारणा पूर्वीपासूनची आहे. जेव्हा बाहेरच्या जगात ती सुरक्षित राहू शकत नाही तेव्हा तिच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात आणि मग पुरुष नराधमांपासून बचाव करण्यासाठी तिला घराबाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात येते. हे आपण इतिहासात अभ्यासलेलेच आहे.
पण आजचा नराधम पुरुष, मुलीचे वय बघत नाही. सहा महिन्यापासून ते 60 वर्षापर्यंतची स्त्री सुद्धा समाजात सुरक्षित नाही. तेव्हा वाटते की ही पुरुष जात हिंस्त्र झाली आहे का? पशुसुद्धा माणसापेक्षा शहाणे आहेत ते जेव्हा माजावर येतात तेव्हाच मादीकडे बघतात. पण अन्याय अत्याचार करीत नाहीत, तर तिला आपलेसे करण्यासाठी नर्तन करणे, गाणे म्हणणे विशिष्ट लकबीने आकर्षून घेणे असे मार्ग अवलंबतात. आपले नरपशू बारा महिने माजावरच कसे असतात?
या सर्व गोष्टींची चीड येऊन जास्तीत जास्त पुरुषांचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. न्याय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे जरूर आहे. घटना घडली की राजकीय लोक त्याचा फायदा उठवतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भाषणे देतात. काही दिवस विषय पेटता ठेवतात, पण परत “ये रे माझ्या मागल्या.’ आज “निर्भया’ केसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा द्यायला किती विलंब लावला गेला, हे आपण पाहिलेच.
या सर्वांवर आता पुरुषांनी निष्क्रियता सोडणे अगदी गरजेचे आहे. कोणी पुरुषांनी या गोष्टींना विरोध म्हणून मोर्चा काढल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. तेव्हा समाजातील या घातक प्रवृत्तीबद्दल पुरुषांनो, एकी करा व या अन्यायाविरुद्ध लढा द्या. जो वकिल या आरोपींच्या बाजूने खटले चालविण्यास घेत असेल आणि कायद्यातील पळवाटा दाखवून त्यांची निष्पक्षता सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असेल त्यावर सर्व वकिल संघटनांनी बहिष्कार घालावा. प्रत्येकाला बचावाची संधी असते हे मान्य केले तरी, इथे वेगळा निकष लावणे गरजेचे आहे, असे वाटते.
जे तथाकथित समाजधुरीण या आरोपींच्या बाजूने बोलत असतील त्यांच्यावर बहिष्कार घालावा. आरोपींच्या आई वडिलांनी पिडीत मुलीच्या आईवडिलांच्या भूमिकेत जाऊन आपल्या अशा करंट्यांची बाजू घेऊ नये. या सर्व परिस्थितीमुळे सामाजिक सुरक्षितता नसल्यामुळे बाई घरात कोंडली जाण्याची भीती आहे, जी 19-20 व्या शतकात होती व मग काही दशकांनी परत कर्वे-आगरकर निर्माण व्हावे लागतील व वर्तुळ पूर्ण होईल.