वेल्ह्यातील चांदरचा संघर्ष जीवघेणा
वेल्हे – वेल्हे तालुक्यातील चांदर गावची भयानक परिस्थिती समोर आली आहे. खरंतर चांदरचा संघर्ष जीवघेणाच आहे. इथल्या लोकांना जगण्यासाठी कडेकपारीची वाट आणि काही मैलांची पायपीट आहे. हीच परिस्थिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. आपल्या आजारी आईला वाचवण्यासाठी रविवारी तिच्या मुलांनी झोळीत बांधून अक्षरशः कडेकपारीतून थरारक प्रवास केला.
चांदर हे पुण्याजवळील वेल्हे तालुक्यातील गाव असून रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील संघर्षमय गाव आहे. इथे रस्ता, लाईट, पाणी नसल्याने इथले लोक वेदनादायी जीवन वर्षानुवर्षे जगत आहेत. प्राचीन अश्म युगातील जीवन आजही जगत असल्याची प्रचिती येते. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला आपल्या जगण्याची शाश्वतीच नाही.
रस्ता नसल्याने इथल्या आजारी रुग्णाला झोळी करून उंच डोंगरांच्या कपारींतून पायवाट काढत कोही मैल जावं लागत आहे. रविवारी इथल्या मुलांना आपल्या आजारी आईला वाचवण्यासाठी कडेकपारीतून थरारक प्रवास करावा लागला. वयोवृद्ध आजी लिलाबाई सांगळे यांची प्रकृती अचानक खालवली.
उपचाराला नेण्यासाठी वाहन येईल, अशी रस्त्याची सोय नव्हती; मग तिला वाचवण्यासाठी तिच्या मुलांची कसोटी चालू झाली. तिला रस्त्यापर्यंत नेण्यासाठी मुलांनी एका काठीला झोळी बांधली. आपल्या खांद्यावर उंच डोंगरांच्या कपारीतून अंगाला कापरं बसेल असा थरारक प्रवास करत महाड येथील सरकारी दवाखान्यात नेले. निसरड्या वाटेने घेऊन जाताना या मुलांच्या खांद्याची कातडी पार सोलटून निघाली होती. थोडासा जरी तोल गेला तर खोल उतारावरून घसरून मृत्युला कवटळावं लागतं. अशा जीवावर उदार होऊन मुलांनी आपली आई लिलाबाई हिला उपचारासाठी दवाखान्यात नेले.
प्रशासनाने प्राधान्याने लक्ष पुरवावे
वेल्हे तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्याप्रमाणे समस्याही अतीच आहेत. इथल्या समस्यांचा पाडा वाचला तर प्रशासनाचे वाभाडेच निघतील, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.