मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विविध धार्मिक संघटनांशी चर्चा सुरु असून राज्यातील प्रार्थना स्थळे पुन्हा खुली करण्याबाबत ते लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
राज्यात ५० टक्के क्षमतेने उपहारगृहे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र प्रार्थना स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.
“मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरु केले जाईल असं सांगितलं आहे. तुम्ही उपहारगृहे सुरु करताना त्यांच्यावर ५० टक्के मर्यादेचे बंधन घालू शकता मात्र प्रार्थना स्थळांच्याबाबतीत असं करता येत नाही.” असं राऊत यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेतील असा विश्वास राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.