मुंबई : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? त्याचबरोबर राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, या जागांसाठी उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे आणि शरद पोंक्षे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र बंद लिफाफ्यात कोणती १२ नावं आहेत ते लवकरच उघड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.