भुईंज – महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्य निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोठी आस्था आहे. त्याचे कारण ते स्वतः शेतामध्ये राबणारे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शेतीवाडी करणारे मुख्यमंत्री लाभले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेले पंधरा दिवस केंद्रस्थानी राहिलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे गावाकडील साधे रूप अनेकांना माहिती नसेल. पण मंत्री असतानाही सातत्याने गावाकडे संपर्क ठेवून आपली गावची शेतीवाडी करणारा हा साधा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. ठाणे येथे उदरनिर्वाहासाठी जाऊन सुरुवातीला रिक्षा चालवणारा हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
पण आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर हे पद मिळवून त्यांनी कष्ट करायची तयारी असेल तर सर्वसामान्य व्यक्तीही यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. गेल्या वर्षी याच दिवसात एकनाथ शिंदे गावाकडे भात लावण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतरही आपल्या घराशेजारील हळदीची शेती असेल किंवा परिसरातील झाडांमध्ये सातत्याने रममाण झालेले एकनाथ शिंदे आज कोयनाकाठचा अभिमान बनले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे हे शेतकऱ्याचे रूप पाहिल्यावर त्यांचे वेगळेपण सिद्ध होते.