मुंबई : देशात करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेने घातल्याचे दिसत आहे. देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांची मोठी परवड होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत.
आज आदरणीय प्रधानमंत्री जी ने फोन किया। उन्होंने सिर्फ अपने मन की बात की। बेहतर होता यदि वो काम की बात करते और काम की बात सुनते।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) May 6, 2021
याच विदारक परिस्थितीवरून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. मात्र फोनवर बोलतांना त्यांनी फक्त ‘मन की बात’ केली. मात्र त्याऐवजी कामाचे बोलले असते आणि आमचं ही ऐकले असते तर बरं झालं असतं’ असं ट्विट करत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.
दरम्यान, झारखंडचे राज्यासह देशातील स्थिती बिकट आहे. राज्यात दररोज संसाधनांचा तुटवड्यामुळे करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे झारखंडमध्ये मोठं संकट निर्माण झालेलं आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असून, राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.
झारखंड सध्या प्रतिदिन ६८० टन ऑक्सिजन निर्माण करत आहे, मात्र त्यांची गरज केवळ ८० टन आहे. मात्र, तिथे कन्टेनर्स, सिलेंडर्स आणि वेपराईझर्सचा तुटवडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही.