मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील एकंदरीत सुरु असणाऱ्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना,”राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, नागरिकांमध्येही अस्वस्थता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा दररोज मुडदा पडत आहे. ब्लॅकमेलिंगचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे केवळ विरोधकांच्या नावाने खडे फोडत आहेत. ते नाकाने कांदे सोलत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात काय झाले होते, याची गुळगुळीत झालेली टेप ते वाजवत आहेत, अशी टीका केली.
राज्य सरकारवर टीका करताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याचा देखील समाचार घेतला. या राज्यात मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री बसला आहे. राज्याला मुख्यमंत्री असता तर अशी वेळ आली नसती. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत आहेत. कारभाराची सारी सूत्रे देवेंद्र फडणवीस हलवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होते. आम्ही त्यांचे प्रशासन पाहिले आहे. पण आता ते देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडतोय, पण ते काही करु शकत नाहीत. त्यांचे सर्व लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. तरीही देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलत आहेत.
काही झालं की ते लगेच विरोधकांवर आरोप करतात. महाविकास आघाडीच्या काळात काय झालं होतं, हे सांगत बसतात. आता तुमची सत्ता आहे, तुमच्या आठ महिन्यांच्या काळात काय झालं ते सांगा. तिकडे केंद्रात मोदी काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात काय झालं हे सांगत बसतात आणि इकडे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात काय झालं हे सांगतात. मग तुमचा काळ कधी येणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.