मुख्यमंत्र्यांचे आभार…
कोयना धरणात यावर्षी कमी पाणीसाठा असून धरणातील 4 टीएमसी पाणी कर्नाटकला देवू नये, अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली होती. आमची मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचा मी आभारी आहे. सदरचे 4 टीएमसी पाणी न दिल्यानेच धरणात आज बऱ्यापैकी पाणीसाठा असून यापुढे कोयना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली.
सणबूर – राज्यावर आलेले पाणीटंचाईचे संकट मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे दूर होण्यास मदत झाली आहे. त्यांनी राज्यातील डोंगरी व दुर्गम भागात जाणवणाऱ्या दुष्काळासंदर्भात तसेच पाणीटंचाई संदर्भात आवश्यक असणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनांना, दुरुस्तीच्या कामांना, नवीन विंधन विहीरी घेणे, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, टॅंकरची आवश्यकता असणाऱ्या गावांना तात्काळ टॅंकर मंजूर करुन देणे, तसेच आवश्यक ठिकाणी चारा छावण्या उभारुन चारा छावणीतील जनावरांना खाद्य पुरवठा करणे, शेतीच्या पंपाची वीज खंडित न करणे इत्यादी कामांचे नियोजन करुन निधी उपलब्ध करुन दिले. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच दुष्काळावर व पाणीटंचाई परिस्थितीवर मात केली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी हे युती शासनाचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.मुंबई येथे सुरु असलेल्या अधिवेशनात आमदार शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर आपले मत मांडताना युतीच्या शासनाने पाटण मतदार संघात विविध पिण्याच्या पाणी योजनांच्या कामांना दिलेल्या निधीसंदर्भात शासनाचे व विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
पाटण विधानसभा मतदारसंघात 4 महसूल मंडलामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या चार मंडलामध्ये पाणीटंचाई जाणवू नये याकरीता उपरोक्त आवश्यक त्या उपाययोजना शासनाच्या मदतीने आम्हास करता आल्या. त्यांनी काही उपाययोजनाही शासनास सुचविल्या. तसेच युती शासनाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, कोयना भूकंप निधी, जलस्वराज्य प्रकल्प, विशेष घटक योजना या विविध लेखाशिर्षातून एकूण 76 नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी मंजूर झाला आहे. एका वर्षात एवढा निधी मंजूर होणे ही महत्वाची बाब मानली जाते.नळ पाणी पुरवठ्याच्या विभागाचे काम हे संत गतीने सुरू आहे. त्या कामांनाही चालना देवून ही पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.