मुंबई : राज्यात दोन दिवसापासून नारायण राणे आणि त्यांचे वक्तव्य यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात झालेला दंगा आणि राणेंच्या अटकेपासून सुटकेपर्यंतच्या नाट्यमय घडामोडी या राज्याने पहिल्या आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत आंदोलने केली. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला.
युवासेना कोअर कमिटीने आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी यांची भेट घेतली. pic.twitter.com/eSNxdgtnXe
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 24, 2021
दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. “नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?”, असा सवालही सरदेसाईंनी उपस्थित केला होता.