शिक्रापूर -ग्रामीण भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फोटोंची क्रेझ निर्माण झाली आहे. युवक-युवती तसेच सर्वच नागरिक व विवाहित जोडप्यांना नवीन चॅलेंजची भुरळ पडली आहे. यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर पती-पत्नी, बहिण-भाऊ यांसह युवक युवतींचे फोटो व्हायरल केल्यानंतर अनेकांना काही मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कपल, सिंगल, सिस्टर, दोस्ती यांसह आई-वडिलांचे, भावांचे, मुलांचे फोटो टाकून वेगवेगळे चॅलेंज नागरिक स्वीकारत आहेत. त्यामध्ये काही उच्चशिक्षित तसेच उच्च पदावरील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
मुळात सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितकाच घातक देखील आहे. यामध्ये युवक व युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवकांना वेगवेगळे फोटो दाखवून देण्याची स्पर्धा सध्या सुरू झाल्याने कित्येक युवक त्यांचे वैयक्तीक फोटोदेखील प्रसारित करत आहेत. मात्र नागरिकांनी त्यांचे वैयक्तीक फोटो प्रसारित करून त्यामध्ये महिलांचे व युवतींचे फोटो टाकणे धोकादायक आहे. यामुळे पुढील काळात मोठ्या त्रासांना सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आल्याशिवाय राहणार नाही.
सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये प्रेमी युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी फोटो पोस्ट करणाऱ्यांना अलर्ट दिला असून फोटो शेअर न करण्याचे आवाहन करणारे भन्नाट ट्विट केले आहे.
नागरिकांनी सोशल मीडियाच्या डीपीवर आपले फोटो लावणे, तसेच वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. त्या फोटोंचा गैरवापर झाल्यास मोठा मनस्ताप होऊ शकतो. नागरिकांनी फोटो
टाकताना सावधानता बाळगली पाहिजे.
– जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग, पुणे जिल्हा