इंदूर: भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात होत आहे. टी-20 मालिका गमावलेल्या पाहुण्यांची भारतीय गोलंदाजीसमोर सरस कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
बांगलादेशला टी 20 मालिकेत पराभव पत्करावा लागला होता, त्यांच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यांत अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केली होती. पहिला सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामने भारताने जिंकले. आजपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे.
या मालिकेत कोहलीला विक्रमाची संधी आहे. त्याने पहिल्या डावात 32 धावा केल्या तर कोहली कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार ठरणार आहे. त्याचबरोबर जलद 5 हजार कसोटी धावा करणारा जगातील पहिला कर्णधार ठरणार आहे. तसेच कोहलीने 147 धावा केल्यास तो कसोटी कारकिर्दीतील धावांच्या बाबतीत गांगुलीला मागे टाकेल. कोहलीच्या 7 हजार 066 कसोटी धावा आहेत. तर गांगुलीच्या कसोटीत 7 हजार 212 धावा आहेत.
कामगिरी महत्त्वाची -कोहली
कोणत्याही सामन्यातील विजय हा तेथील परिस्थिती किंवा मैदान यांवर अवलंबून नसतो तर तुम्ही कामगिरी कशी करता यावर असतो, असा सल्ला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सहकारी खेळाडूंना दिला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून येथे सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या सराव सत्रानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहलीने आपले मत मांडले. घरच्या मैदानावर खेळत आहोत म्हणून आपलाचा विजय होईल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागते. सामना घरच्या मैदानावर असो, तरीदेखील आपल्याला सरस खेळ करावाच लागेल, असेही कोहली म्हणाला.
संघाच्या सातत्यपूर्ण यशात गोलंदाजांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करत कोहली म्हणाला, उमेश यादव महंमद शमी व ईशांत शर्मा यांनी सरस कामगिरी केली आहे. विशेषतः दुसऱ्या डावात शमी जास्त अचूकपणे गोलंदाजी करत असून त्यामुळे आम्हाला सामना जिंकणे सोपे ठरत आहे. आता पुढील काळात संघाला सातत्याने सामने खेळायचे असून गोलंदाजांनी अचूकतेबरोबरच तंदुरुस्तीदेखील टिकविली पाहिजे. जसप्रीत बुमराह दुखापतीने संघाबाहेर असला तरी या गोलंदाजांनी ती उणीव भरून काढली आहे.