जम्मू – देशाच्या शहरी भागातील जमीन वनांखाली यावी यासाठी केंद्र सरकारने देशात चारशे शहरांमध्ये शहरी जंगल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नगर वन या नावाने हा प्रकल्प ठिकठिकाणी राबवण्यात येणार आहे.
त्यातील एक प्रकल्प जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये उभारला जाणार आहे. शहरांच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये रोपवाटिकांचे प्रकल्प सुरू केले जातील. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी काल ही माहिती दिली. वनांचे संरक्षण आणि विकास करण्यासाठी वन हक्क कायद्यात बदल केले जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारतर्फे जम्मू-काश्मीरच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सध्या काही केंद्रीय मंत्री तिकडे पाठवले जात आहेत. त्यानुसार चौबे हे दोन दिवसांच्या रामबनच्या दौऱ्यावर आले आहेत.