नवी दिल्ली – देशात करोनारुग्णांना औषधे, ऑक्सिजन आणि बेडस मिळत नसल्याने संपूर्ण देशभर मोठाच हाहाकार माजला आहे. या विषयावरून आज पुन्हा एकदा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सअभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले आहेत. याची सारी जबाबदारी भारत सरकारवरच जाते आहे.
देशातील करोना स्थितीची हाताळणी करण्यात मोदी सरकारला पूर्ण अपयश आले आहे. ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याची सारी व्यवस्था मोदींनी सेंट्रलाईज केली आहे. त्यामुळे राज्य सरकारांना सतत केंद्राकडे मदत मागावी लागत आहे. ही पुरवठा व्यवस्था विकेंद्रित केली तर अजूनही काही वेळातच ही स्थिती सुरळीत होऊ शकते. त्यामुळे मोदींनी ही व्यवस्था त्वरित विकेंद्रित करून राज्यांना या वस्तूंच्या खरेदीला अनुमती द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षातर्फे सातत्याने केली जात आहे.