पिंपरी – प्राप्तीकर विभागाने केलेल्या धाडसत्रामागे केंद्र सरकार असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे वक्तव्य केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहेत. इडी, इन्कम टॅक्स, एनसीबी या स्वतंत्र यंत्रणा असून, अनियमितता असलेल्या ठिकाणच्या अनेकांच्या आतापर्यंत चौकशा झाल्या आहेत. या यंत्रणांनी वेळ न घालविता, लवकरात लवकर या प्रकरणांचा तपास पूर्ण करावा, अशी अपेक्षादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता राज्यमंत्री आठवले हे मंगळवारी (दि.19) शहरात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
सिनेअभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला ड्रग्सच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप कामगारमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, या क्रुजवर ड्रग्स असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यांना मुद्दाम पकडण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना एनसीबीने धागेदोरे शोधत ड्रग्स विक्रेते व ड्रग्स सेवन करणाऱ्या अनेकांना अटक केली होती. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा वापर केला जात आहे. फिल्म इंडस्ट्री ड्रग्समुक्त झाली पाहिजे. त्याकरिता आतापर्यंत अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले.