मुंबई – करोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने रेमडेसिविरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता आतापर्यंत राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिविर इंजेक्शन देणाऱ्या दोन कंपन्यांनी आश्चर्यकारकरित्या आपली भूमिका बदलून 31 मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त 500 इंजेक्शनचा पुरवठा करू, असे कसे सांगितले. या कंपन्यांच्या अचानक बदललेल्या भूमिकेमागे केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेला दबाव’ कारणीभूत आहे का? राज्याला रेमडेसिविर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असले तरी राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये. तर वेळ प्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे अशी आग्रही मागणी पटोले यांनी आज मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत’ केली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना विरोधातील लढ्यासंदर्भात काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी कॉंग्रेसशासित राज्यातच करोनाची वाईट परिस्थिती आहे. त्यांना सल्ला द्या असे उर्मट, असुसंस्कृत व अशोभनीय उत्तर दिले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कॉंग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील परिस्थिती नीट पहावी असे पटोले म्हणाले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात करोना परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आता करोनाची भीती राहिली नाही, असे म्हटले होते.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवडणुका असलेल्या राज्यात करोना नाही.’ अशी मुक्ताफळे उधळली होती. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोनाचे गांभीर्य ओळखून पश्चिम बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रचारसभा रद्द केल्या; परंतु प्रधानसेवक मात्र आजही दिवसाला 4-4 सभा घेत आहेत याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.
देशात 45 वर्षावरील लोकांनाच करोनाची लस देण्याचा नियम असताना देवेंद्र फडणवीसांचे नातेवाईक असलेल्या 25 वर्षीय तन्मय फडणवीस यांना लस कशी मिळाली? मोदी सत्तेत आल्यापासून गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्यासह भाजप नेत्यांचे नातेवाइक आणि दोन-चार निवडक उद्योगपती मित्र यांच्यासाठीच सरकार काम करत आहे असा आरोपही पटोले यांनी केला.