पुणे – जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू असून त्याअंतर्गत तालुक्यातील गावांची केंद्राच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. आतापर्यंत बारामती, इंदापूर, शिरूर, हवेली, जुन्नर, वेल्हा तालुक्यातील गावांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर आंबेगाव तालुक्यात गावांची पाहणी सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.
या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग घ्यावा, तसेच स्वच्छ सर्वेक्षणातील आपला अभिप्राय ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोबाइल ऍपवर नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्यासाठी स्मार्ट मोबाइलधारक ग्रामस्थांनी प्ले-स्टोअरमध्ये जाऊन “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण अंतर्गत एसएसजी 2019′ हे मोबाइल ऍप डाउनलोड करून त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-2019′ या देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे.