दूधप्रश्नी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा नगरमध्ये घणाघात
नगर (प्रतिनिधी) – दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यातील भाजपनेही काही मागण्या केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळणार असेल, तर भाजपच्या आंदोलनाचे स्वागतच आहे. मात्र, राज्यातील ही भाजप दुतोंडी आहे. शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलेच. मात्र, केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्पच आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने केंद्रातील सरकारलादेखील जाब विचारायला हवा. केंद्रालाही त्यांनी टार्गेट करावेच, अशी परखड भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज येथे मांडली.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलिकडील चौकात जनरल पोस्ट ऑफीससमोरच मोर्चा अडविला. तेथील चौकातच ठाण मांडून शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपसह सर्वच पक्षांवर शेट्टी यांनी तोफ डागली. शेतकऱ्यांप्रमाणेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. करोना महामारीने अनेक कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली. अनेक तरुणांचा रोजगार बुडाला. ऑक्सीजनअभावी अनेक करोनाबाधितांचा तडफडून मृत्यू झाला. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला कोणत्याच पक्षाला वेळ मिळाला नाही. सर्वांनाच एकाच गोष्टीत रस होता, हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्देवी असल्याची टीकाही शेट्टी यांनी यावेळी केली.
सुशांतसिंह इतकीच चर्चा शेतकऱ्यांवर देखील व्हावी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत एक चांगला अभिनेता होता. त्याची आत्महत्या नक्कीच दुर्देवी आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येच्या मुद्यावर जेवढी चर्चा राज्य व केंद्रात झाली. तेवढीच चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली असती, तर समाधान वाटले असते, अशी टीकाही शेट्टी यांनी यावेळी केली. हजारो शेतकऱ्यांनी अलिकडच्या काळात आत्महत्या केल्या. त्यावर राज्य किंवा केंद्र सरकारलाही वेळ नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आंदोलकांकडून फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा…!
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कोठला मैदान येथून मोर्चाला प्रारंभ केला. मोर्चात सहभागी झालेल्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. तसेच त्यांच्यात फिजिकल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाल्याचे चित्र होते. अगदीच एकमेकांना घासून कार्यकर्ते चालच होते. नगरमध्ये काल रात्रीपर्यंतच करोनाबाधिताच्या संख्येने जवळपास पंधरा हजारांचा टप्पा गाठला आहे. करोना विषाणूची नगरमध्ये प्रचंड दहशत असतानाही “स्वाभीमानी’ने केलेल्या या आंदोलनाकडे नगरकर आज भयचकित होऊन पाहत होते.