कॉंक्रिटीकरणावर 50 कोटींचा खर्च : अंतर्गत रस्तेही सिमेंटचे बनविणार, पाणी कोठे मुरणार?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील तीन वर्षांपासून शहरातील रस्ते कॉंक्रिटीकरणावर मोठा भर दिला आहे. मुख्य रस्त्यांसोबत आता शहरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. आधीच शहरातील सर्वच जागी इमारती आणि घरांमुळे मोकळ्या जागा कमी उरल्या आहेत.
हौसिंग सोसायट्यांमधील परिसर आणि लहान-लहान घरांचे अंगण देखील सिमेंटने रंगविण्यात आले आहेत. दुसरीकडे पालिकाही अंतर्गत रस्त्यांवर सिमेंटचे थर देत आहे. मात्र हे करत असताना शहराच्या पर्यावरण संतुलनाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील बहुतेक जमीन सिमेंटच्या थराखाली लपली जात असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही.
परिणामी शहरातील भूजल पातळीही खालावली आहे. शहरातील अनेक रस्ते सुस्थितीमध्ये आहे. मात्र अशा रस्त्यांवर उधळपट्टी करत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल 49 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्याला नुकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे. प्रभाग क्रमांक 21 पिंपरीतील शास्त्री गार्डन आणि इतर परिसरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
पिंपरीतील एच.बी.ब्लॉक आणि इतर परिसरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील थेरगाव गावठाण परिसरातील अंतर्गत गल्ल्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील मोरया हॉस्पिटल ते यशोपुरम ब्रिज, लिंक रोड अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 31 मधील कृष्णा चौक ते साई चौक रस्ता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने विकसित केला जाणार आहे.
प्रभाग क्रमांक 24 मधील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आधीच नैसर्गिक नाले, ओढे बुझवून पाणी मुरण्याचे आणि पावसाळी पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग अवरुद्ध करण्यात आले आहेत. यामुळे 2019 च्या पावसाळ्यात वारंवार पूर परिस्थितीशी तर हिवाळा संपण्यापूर्वी पाणी टंचाईच्या संकटांशी नागरिकांना झुंजावे लागले आहे. त्यात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाशी खेळ सुरु आहे.
पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याचा प्रकार
शहरात सिमेंटचे जंगल उभारत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाली. यामुळे शहरात आती थोडीच झाडे उरली आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या या झाडांच्या मुळांना कॉंक्रिटीकरण आणि सिमेंट ब्लॉकमुळे पाणी कसे मिळणार? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. दुसरीकडे महापालिका आता नवीन बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना पाण्याची व्यवस्था स्वतःच करा, अशी अट घालत आहे. बऱ्याच ठिकाणी बोअरवेल द्वारे पाणी घेतले जात आहे. जमिनीवर सिमेंटचा थर असेल, तर जमिनीत पाणी मुरणार कसे आणि नागरिकांना ते मिळणार कसे? सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील भूजलसाठा खाली गेला आहे.
अनेक भागातील बोअरवेल बंद पडल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांना टॅंकर सुरु करावे लागले आहेत. तसेच सिमेंटचे रस्ते लवकर तापत असल्याने शहराच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रस्त्यांचे डांबरीकरण सुस्थितीत असतानाही सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यामाध्यमातून केवळ ठेकेदार पोसण्याचा धंदा महापालिका करत आहे.
नागरिकांनी मागणी केलेली नसतानाही महापालिका सिमेंटचे रस्ते बनवत आहे. सिमेंटचे रस्ते खूप दिवस टिकतील यामध्ये काही वाद नाही. मात्र पर्यावरण संतुलनाचे काय याचा विचार महापालिकेने करायाला हवा. सिमेंटच्या रत्यामुळे पाणी मुरत नाही हा एक भाग झाला. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ होते. हे रस्ते जास्त लवकर तापतात. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होते. आपले शहर अद्याप पूर्ण नियोजित नाही. पुन्हा हा रस्ता खोदण्याची वेळ आली तर काय. कारण सतत शहरामध्ये खोदकाम सुरु असते. हे रस्ते करत असताना पाण्यासाठी लाईन ठेवा. इतर भूमीगत वाहिन्या टाकणे आवश्यक आहे.
– विकास पाटील, पर्यावरण तज्ज्ञ