कोलकाता – बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या प्रकरणाची कालबद्ध पद्धतीने चौकशी केली जावी अशी मागणी तृणमुल कॉंग्रेसने केली आहे. कोणत्याही नेत्याने काही चुकीचे केले असेल तर पक्ष यात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिकाही तृणमुल कॉंग्रेसने घेतली आहे.
सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने तृणमुलचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्याशी संबंधीत एका महिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात किमान 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, ज्या महिलेच्या ताब्यातून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे, तिच्याशी तृणमुल कॉंग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही.मात्र हा तपास ईडीच्या अन्य प्रकरणांप्रमाणे दीर्घकाळ प्रलंबीत राहयला नको. हा तपास तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने पुर्ण केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.