ड्रायव्हर गेलेत गावाला; जीवनावश्यक वस्तू पडल्या अडकून
– संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – देशातील 85% वाहतूकदार हे एक ते पाच ट्रकचे मालक असून मालवाहू ट्रकवर काम करणारे बहुसंख्य ड्रायव्हर हे ग्रामीण भागातील आहेत. बहुसंख्य ड्रायव्हर संचारबंदीमुळे गावाकडे गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर बंदी नसली तरी अशा वस्तू पोहचविण्याकरीता मालवाहू गाड्यांना चालकच नसल्याने शहर तसेच उपनगरांतील वितरक, होलसेल विक्रेत्यांकडे मालच आलेला नाही. यातून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा काही प्रमाणात किरकोळ विक्रेत्यांकडे आता जाणवू लागला आहे.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करीत आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठ्यावर बंधने घालण्यात आलेली नाहीत, अशा वस्तूंचा पुरवठा सुरूच आहे. परंतु, लॉकडाऊनच्या काही दिवसापर्यंत हा पुरवठा सुरळीत होत होता. परंतु, अनेक ठिकाणी मजुर तसेच तत्सम् कामगारांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. यामध्ये मालवाहू गाड्यांचे चालक, क्लिनर यांचाही समावेश आहे. यातून चालकांअभावी अनेक कंपन्यांबाहेर ट्रक थांबून असल्याचे वितरक सांगत आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह, सौंदर्य प्रसाधाने, घर स्वच्छतेच्या वस्तू अशा अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा तुटवडा आता काही प्रमाणात जाणवू लागला आहे. शहर तसेच उपनगरांतील बहुसंख्य वितरकांकडील सर्व गरजेच्या वस्तूंचा साठा कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील व परराज्यातील कंपन्यांमधून तयार झालेल्या जीवनावश्यक वस्तू वितरकापर्यंत पोहचण्यात अडणची येत आहेत. मालाचे ट्रक आल्या संदर्भात आर्मी विभागातूनही रोज विचारणा होत आहे. कंपन्या तसेच काही ठिकाणचे सिएनडीएफ (कंपन्यांचे मुख्य वितरक) यांच्या गोदामांपुढे ट्रक चालकांअभावी उभे आहेत. ड्रायव्हर नसल्यामुळे मालट्रक पाठविणार तरी कसा? असा प्रश्न पडला आहे. केवळ चालकांअभावी मालवाहू व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ही स्थिती कायम राहिली तर भविष्यात अनेक गोष्टींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत संबंधीत यंत्रणेने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.
राज्यातील ग्रामीण भागातून आलेले ड्रायव्हर आपापल्या गावी गेले आहेत, त्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांनी केल्या आहेत. परंतु, प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद असल्याने तसेच दुचाकीत पेट्रोल दिले जात नसल्याने त्यांना त्यांच्या गावावरून कंपनीपर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक पोलिसांकडून प्रमाणपत्र घेऊन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑफिसपर्यंत तरी यावे, असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाने या अडचणीच्या मुद्यावर पर्याय शोधावा.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना व संचालक ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस, नवी दिल्ली