राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यातील चासकमानच्या डाव्या कालव्यावरून जात असताना राजगुरुनगर सातकरस्थळ येथे स्टेअरिंग लॉक झाल्याने कार पाण्यात कोसळली. स्थानिक तरुणांच्या मदतीने कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह पती-पत्नीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. पाण्याच्या प्रवाहात कार मात्र वाहुन गेली.
रविवारी (दि. 13) दुपारी प्राथमिक शिक्षक गणेश मगर हे त्यांच्या कारमधून (एमएच 14 — 5027) सौरंग्या डोंगरावरील श्री दत्ताचे दर्शन करून परत चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरून राजगुरुनगर शहराकडे नजीकच्या मार्गाने येत होते. सातकरस्थळपूर्व जवळ येत असताना चासकमानच्या डाव्या कारचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने कार कालव्यात पडली. जवळपासच्या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तरुणांनी कालव्याकडे धाव घेतली. वाहत्या कालव्याच्या पाण्यात उतरून जीवाची पर्वा न करता अशोक सातकर, संदीप सातकर, सुनील सातकर, तुषार सातकर, सुदर्शन मुळूक, माजी उपसरपंच सचिन सातकर, अविनाश खांगटे यांनी कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह शिक्षक पती पत्नीला सुखरुप पाण्यात वाहून जाणाऱ्या गाडीतून बाहेर काढले.
नशीब बलवत्तार म्हणून…
तरुणांनी तातडीने कालव्यात उडी मारुन वाहत्या कारचे दरवाजे उघडून कार मधील तीन चिमुकल्या मुलांसह दोन महिलांना बाहेर काढले नशीब बल्लवत्तर म्हणून वाचलो, अशी भावना कारमधील महिलेने व्यक्त केली. मदत करणाया स्थानिक तरुणांचे आभार मानले.