पुणे : राज्य सरकारच्या “महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थे’च्या आस्थापनेतील रिक्त पद भरतीच्या गुरूवारी नियोजित करण्यात आलेल्या मुलाखती रद्द केल्याने उमेदवारांनी ससून रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. मुलाखती रद्द करण्यात आल्याची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने उमेदवारांचा येथे येऊन एकप्रकारे मानसिक छळ झाल्याचा आरोप यावेळी उमेदवारांनी केला. ही मुलाखत प्रकिया नक्की कोणाच्या सांगण्यावरून रद्द केली गेली, याचा लेखी खुलासा उमेदवारांनी मागितला.
या मुलाखतीसाठी नागपूर, गोंदिया, कोकण अशा लांबच्या भागातून सुमारे पाचशे ते सहाशे उमेदवार आले होते. सध्या असलेली करोना आणि पूरस्थिती असतानाही हे उमेदवार येथे मुलाखतीसाठी आले आहेत. येथे आल्यावर या मुलाखती रद्द झाल्याचे सांगण्यात आले. या मुलाखती रद्द का झाल्या अशी विचारणा केली असता, विभागाला ठोस उत्तर देता आले नाही, शिवाय त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप या मुलाखतीसाठी आलेले उमेदवार छगन ढाकणे यांनी केला.
मंत्रालयातील उपसंचालकांनी ही प्रक्रिया रद्द केली असे सांगितले जाते तर दुसरीकडे येथील प्रशासनाने ती केली असे सांगितले जाते. त्यामुळे दोन उत्तरात तफावात आहे. याविषयी आम्ही आरोग्य विभागाच्या उपसंचालकांशीही संपर्क केला, त्यामुळे मुलाखती रद्द करण्यामागे सरकार किंवा मंत्रालयाचा संबंध नसल्याचे समजल्याचे ढाकणे म्हणाले.
त्यामुळे पदभरती सरकारकडूनच रद्द करण्यात आल्याचे जर सांगितले जात आहे तर त्यांनी आम्हांला तसे लेखी द्यावे, अशी मागणीही उमेदवारांकडून करण्यात आली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांचीही या संदर्भात भेट घेणार असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले.
या विषयाची पार्श्वभूमी अशी की, “मानसिक आरोग्य संस्थे’च्या आस्थापनेत जी रिक्त पदे आहेत ती तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर 14 आणि 16 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार या पदाच्या मुलाखती 29 जुलै रोजी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी उपलब्ध न झाल्याने संस्थेचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी विभागप्रमुख म्हणून जी प्रक्रिया सुरू केली होती ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संस्थेमार्फत एक दिवस आधी म्हणजे 28 जुलै रोजी मुलाखती रद्द झाल्याचे उमेदवारांना इमेलद्वारे कळवल्याचा खुलासा संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत यांनी केला आहे.
अर्जावर नमूद केलेल्या इमेलवर ही नोटीस आम्ही पाठवल्याचे डॉ. अभिवंत यांचे म्हणणे आहे. परंतु दहाच उमेदवारांना इमेल मिळाल्याचा उमेदवारांचा आरोप आहे.
वस्तुत: आम्हांला ही पदे भरायची आहेतच. आरोग्य सेवेवरचा सध्या जो ताण आहे तो पाहता ही पदे आम्हांला लवकरात लवकर भरावी लागणारच आहेत. परंतु, या पदभरतीसंदर्भात सरकारकडून विविध प्रशासकीय बाबी उपस्थित करण्यात आल्या होत्या, असे डॉ. अभिवंत म्हणाले. तसेच मुलाखती रद्द झाल्याचे संकेतस्थळावर बुधवारीच (दि. 28) प्रसिद्ध केल्याचे तसेच उमेदवारांनी अर्जावर जे इमेल दिले होते त्यावरही कळवण्यात आल्याचे डॉ. अभिवंत यांनी नमूद केले.