आमदार कर्डिलेंसह शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात । सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नगर – शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्यातील चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या छावण्या बंद करण्याच्या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
पाथर्डी, जामखेड तालुक्यातील चारा छावण्या बंद करण्याचे तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी सोशल मीडियावर तसेच तोंडी आदेश चारा छावणी चालकांना दिल्याने, छावणी चालकाने चारा छावण्या बंद केल्या. त्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी द्विवेदी यांची भेट घेवून चारा छावण्या पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
आ. कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे विहिरींना, बोरवेल तसेच छोटी मोठी तळे कोरडीच आहेत. हे प्रशासनाने पहावे व शहानिशा करावी.
रस्त्याच्या कडेला हिरीगार गवते पाहून छावण्या बंद करू नये. जिल्ह्यातील धरणे भरली असली तरी तालुक्यातील गावांची वस्तूस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मुबलक चारा व पाणी उपलब्ध होई पर्यंत चारा छावण्या सुरु ठेवा, असे ही जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी पाथर्डी, जामखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात अकोले, संगमनेर वगळता अन्य तालुक्यात पावसाने 50 टक्के देखील हजेरी लावलेली नाही.
पालकमंत्र्याचा प्रशासनावर वचक नाही
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतांना प्रशासनाकडून तोंडी आदेश देत छावण्या बंद करण्याचे सांगण्यात येते आहे. तलाठी, मंडल अधिकारी हे परस्पर छावणी चालकांना छावणी बंद करण्याचे सांगत आहेत. मात्र वरिष्ठांकडे विचारणा केली असता छावणी बंद करण्याचे सांगितले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्येच सुसंवाद नसल्याने पशु उत्पादक शेतकरी मात्र भरडला जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातही अशीच स्थिती असल्याने, आपली व्यथा मांडावी, हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचाच प्रशासनावर वचक राहीला नसल्याचे शेतकऱ्यामधून बोलले जात आहे.
छावणीबाबत मंत्री, लोकप्रतिनिधी गप्पा का?
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतांना दोन वजनदार कॅबिनेट मंत्री व एक विधान सभेचे अभ्यासू उपाध्यक्ष असतांना त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी माहित असून, सुद्धा हे छावणी बंद का केल्या जात आहेत. याबाबत प्रशासनाला जाब का विचारत नाही की अधिकारी त्यांचे ऐकत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
प्रशासनातील विसंवादाची शेतकऱ्यांना झळ
अनेक तालुक्यातील चारा छावणी चालकांनी प्रशासनाच्या भितीपोटी छावण्या बंद केल्या आहेत. प्रशासनामध्ये विसंवाद असल्याने अधिकारी व छावणी चालकांच्या कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी प्रशासनापुढे हतबल झाला असून, जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे चारा निर्माण झाला नाही. अद्यापही विहिरी, तलाव, बंधारे कोरडे आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत आला आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.