कायद्याबाबत समाजामध्ये गैरसमज
पुणे – नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमांच्या विरोधातील नाही. या कायद्याबाबत मुस्लिम समाजाचे गैरसमज असल्याने त्यांनी कायदा समजून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच, या कायद्याविरोधात देशभरात उसळलेल्या हिंसाचारात कॉंग्रेस पक्षाचा हात असल्याचा, आरोप आठवले यांनी रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) राज्य कार्यकारणी बैठकीसाठी आठवले पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
रिपाइंचे देशभरात 1 कोटी सदस्य बनविण्यासाठी गाव पातळीपासून सुरुवात करून संघटना बांधणी मजबूत करणार आहे. याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीने अद्यापही पूर्णपणे खातेवाटप न केल्याने हे सरकार किती दिवस टिकणार, अशी शंका उपस्थित होत आहे.
देशात “सीएए’ आणि “एनआरसी’ कायद्याला हिंसक आंदोलनाचे स्वरुप लागले आहे. यापूर्वी, देशात तीन तलाक, आयोध्येतील राममंदिर प्रकरणाचा निकाल लागला. मात्र, त्याचे कोणतेही पडसाद उमटले नव्हते. आता या कायद्याविषयी कॉंग्रेस पक्षानेच मुस्लिमांना रस्त्यावर उतरविले असल्याची टीका आठवले यांनी केली.
जिल्हा पातळीवर आंदोलन
राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. परंतु, या कर्जमाफीत राज्यातील महामंडळाचा समावेश करून संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
फडणवीस-आठवले भेट
रिपाइंची राज्यपातळीवरील कार्यकारणीची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती. त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही कामानिमित्त आले होते. आठवले यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक फडणवीस हे आठवले यांना भेटावयास आले. तसेच, ही सदिच्छा भेट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.