नवी दिल्ली – विविध राज्यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबतचा सस्पेन्स आणखी काही दिवस कायम राहणार आहे. त्या पोटनिवडणुकांचा निर्णय निवडणूक आयोग 29 सप्टेंबरला घेणार आहे.
लोकसभेची 1 जागा आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या 64 जागा रिक्त आहेत. त्या पोटनिवडणुका बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याचे सूतोवाच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने केले होते. त्यानंतर शुक्रवारी बिहार निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पत्रकारांनी पोटनिवडणुकांबाबतचा प्रश्न विचारला.
त्यावर चार दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि निवडणूक आयुक्तांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील लोकसभेची एक जागा रिक्त आहे. विधानसभेच्या जागांचा विचार करता पोटनिवडणुकांच्या दृष्टीने मध्यप्रदेशला महत्व प्राप्त होणार आहे. त्या राज्यातील तब्बल 27 जागांवर पोटनिवडणुका होतील. त्याशिवाय, गुजरात, उत्तरप्रदेशमधील प्रत्येकी 8 जागा रिक्त आहेत.