कोपरगाव -गोदावरी डाव्या कालव्यात सध्या आवर्तन सुरू आहे. आज सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ब्राह्मणगाव परिसरातील आहेरवस्तीनजीक हा कालवा फुटला. त्याची माहिती मिळताच संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी कारखान्याची यंत्रणा पाठवून फुटलेला भराव तत्काळ बुजविला. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाअंतर्गत गोदावरी कालव्यांना एक जूनपासून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. गोदावरी डाव्या कालव्याला ब्राह्मणगावनजीक आहेरवस्ती शेजार हा कालवा आज सकाळी सव्वासातला फुटला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कारखान्याची यंत्रणा घटनास्थळी पाठवून दिली.
तसेच गोदावरी डाव्या कालव्याचा फुटलेला भराव जेसीबीच्या साह्याने बुजविला. त्यामुळे आसपाच्या शेतकऱ्यांची होणारी हानी टळली आहे. गोदावरी डावा कालवा उपविभाग कोपरगावचे उपअभियंता दिघे व ब्राह्मणगाव सिंचन शाखेच्या शाखा अभियंता एन. यू. कुऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांना अहवाल पाठविला.