नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात आलेले ‘बुलबुल’ हे चक्रीवादळ दिवसागणिक तीव्र होताना दिसते आहे. ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने ओडिशा, पश्चिम बंगालहून हे वादळ बांगलादेशकडे सरकत असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
‘बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगालमध्ये खबरदारी घेण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंदही ठेवण्यात आला होता. तसेच, किनारपट्टी भागातील जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
या वादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व मदिनापूर, पश्चिम मदिनापूर, हावरा, नदिया, हुगळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ओडिशा राज्यात बुलबुल चक्रीवादळामुळं मोठे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले असून, बचावकार्य राबवले जाते आहे. मात्र, अनेक भागात संपर्क तुटला आहे.