नवी दिल्ली, दि. 14 -आगामी वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी चालू असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. अर्थमंत्रालय विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांबरोबर अर्थसंकल्पाबाबत दरवर्षी चर्चा करीत असते. मात्र, या वर्षी सोशल डिस्टन्सिंगमुळे अशी थेट चर्चा न करता आता मंत्रालयाने विविध क्षेत्रांना आपल्या सूचना ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.
त्यामुळे प्रवासातील अडचणी कमी होतील. त्याचबरोबर अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, असे अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. याकरिता अर्थमंत्रालयाने एक विशेष ई-मेल आयडी तयार केला आहे.
उद्योजकांच्या विविध संघटनांकडून थेट बैठकीऐवजी ई-मेलच्या माध्यमातून सूचना मागविण्यात याव्यात, अशी विनंती केली होती. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही आपल्या सूचना अर्थमंत्रालयाला कळविता याव्यात याकरिता माय गव्हर्नमेंट पोर्टलवर सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याचा लोकांना फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरलेल्या वर्षातील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाचे उद्दिष्ट बारगळले होते. त्यातच सरकारचा खर्च वाढल्यामुळे आणि महसूल कमी झाल्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची तूट ठरविलेल्या 3.5 टक्क्यापेक्षा जास्त होणार आहे. आगामी अर्थसंकल्पात तूट कमी करण्यावर सरकारला भर द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येते.