पिंपरी, (प्रतिनिधी) – आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठली आहे. त्यामुळे बहुतेक भाज्यांचे दर 80 ते शंभर रुपयांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे अनेक गृहिणींनी व शहरातील खाणावळचालकांनी भाजीपाल्यापेक्षा कडधान्याला पसंती दिली आहे. राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस सुरू झालेला असला तरी, त्यानंतर पाऊस लांबल्याने बाजारात सर्वच भाज्यांचे दर तेजीत आहेत.
किलोभर गवारसाठी 80 ते120 रुपये तर इतर सर्वच भाज्या 80 ते 100 रुपये किलोने उपलब्ध आहेत. टोमॅटो, वांगी, कारली, शेवगाच्या शेंगा यांच्या दरांतही मोठी वाढ झाली. त्यामुळे महिलांची व खणावळचालकांची पसंती उसळ, काबुलीचणा, मटकी, पावटा आदी कडधान्याला मिळत आहे.
पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरांत वाढ झाल्यानंतर आता बटाट्याच्या दरांतही वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या किलोभर बटाट्यांसाठी आता 40 रुपये मोजावे लागत होते. कांदेही 30 ते 40 रुपये किलोपर्यंत पोचले आहेत.
मेथी, कोथिंबीर गायब
आठवडे बाजारात मेथी, कोथिंबीर यांच्या आवकेत मोठी घट झाल्यामुळे मेथीची जुडी 40 ते 50 रुपये तर कोथिंबिरीच्या जुडीसाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागत होते. कारले, भोपळा या वेलवर्गीय भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे.
भाज्यांपेक्षा मांसाहारी पदार्थ आवाक्यात
शाकाहारी भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये प्रतिकिलोवर पोचल्याने भाज्या खरेदीसाठी ग्राहक फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. या दरोक्षा कमी किंमतीत अंडी व सुकी मासळी मिळत असल्याने नागरिकांची अंडी, सुक, व बोंबील या मांसाहरी पदार्थांना पसंती मिळत आहे.